पाटणा : बिहारच्या तरुणांना आता भाषणबाजी नको असून त्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी रोजगार हवा आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुणांच्या रोजगारासंबंधी चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला.ते रविवारी (दि.२०) युवक काँग्रेसच्या वतीने पाटणा येथे आयोजित करण्यात महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारने रोजगाराच्या नावावर फक्त आश्वासने दिली, पण रोजगार देण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. बेरोजगारीमुळे लाखो तरुणांना बिहारमधून स्थलांतर करावे लागत आहे. पण, त्यांना खरे म्हणजे स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी द्यायला हव्यात, आम्ही मात्र यासाठी वचनबद्ध आहोत. बिहारचे तरुण मेहनती, सक्षम आणि प्रतिभावान आहेत. त्यांना फक्त स्थानिक आणि सन्माननीय रोजगाराची आवश्यकता आहे. आता, बदलाची सुरुवात झाली आहे.काँग्रेस आणि भारत आघाडी केवळ आश्वासने देत नाहीत तर उपायही आणत आहेत. आमचे लक्ष्य स्पष्ट आहे. कौशल्यांचे हक्क, प्रत्येक तरुणाला रोजगार, स्थलांतर थांबवणे, प्रत्येक कुटुंबाला एकत्र ठेवणे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, या महारोजगार मेळाव्यात हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते. तरुणांची इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती आत्मविश्वास आणि बदलाची गरज दाखवणारा निर्णायक टप्पा असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. तसेच काँग्रेस व इंडिया आघाडीच्या वतीने तरुणांठी रोजगार, कौशल्यविकास आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही दिले. दरम्यान, बिहार सरकारने पाच वर्षांत एक कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. राहुल गांधींनी मात्र हा निवडणुकीआधीचा खोटा वादा असून त्याची अंमलबजावणी होणार नाही, अशी टीका केली आहे. युवा काँग्रेसने देखील एक्सवर पोस्ट करत म्हटले की, रोजगार मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हा राज्यातील बेरोजगारीच्या गंभीर परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. “जयपूर आणि दिल्लीनंतर, हा आमचा आणखी एक प्रयत्न होता जेणेकरून पात्र तरुणांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील,” असे त्यांनी म्हटले.
