पुणे : लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते. आठ ते अकरा या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यात ठेवण्यात येईल आणि बारा वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परिचय : डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय जयंतराव टिळक यांचे ते सुपुत्र होते. जयंतराव टिळक हे १२ वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते.
दीपक टिळक हे स्वर्गीय इंदुताई टिळक यांचे पुत्र होते. इंदुताई या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सेवा सदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. अशाप्रकारे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे दीपक टिळक यांना बालपणापासूनच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये रस निर्माण झाला होता. २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.