मुंबई : २००८ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईमध्ये झालेलेल्या दहशतवादी हल्ल्याची आज १७ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये मुंबई हल्ल्यात बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करावा. तर राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत बंद करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रपती मुर्मू यांनी बुधवारी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान देशाचे रक्षण करताना प्राणार्पण करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि देशवासियांना सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निश्चय पुन्हा दृढ करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपतींनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर पोस्ट करून लिहिले, “२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्या शूर सैनिकांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते, ज्यांनी आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करताना प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला कृतज्ञतेने स्मरतो. चला, सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया. आपण सर्वजण मिळून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ आणि एक मजबूत व समृद्ध भारत उभारण्याचा निश्चय करूया.”
राज्यसभा सदस्य आणि मुंबई हल्ल्याचे विशेष सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना म्हटले, “या हल्ल्याला १७ वर्षे झाली. प्रत्येक भारतवासीयाला हा दिवस आठवतो. मला आठवते, जेव्हा आम्ही पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा आमच्या सरकारने मुंबई हल्ल्याचा मुद्दा उचलला होता. आम्ही हल्ल्याचे जबाबदार आणि कटकारस्थान करणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याची चौकशी केली होती. त्यांनी काही लोकांना अटक केली, परंतु त्यांच्या खटल्यांबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्तानने याबद्दल कधीच काही सांगितले नाही.”
उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “आजपर्यंत लोकांना माहिती नाही की मुंबई हल्ल्याचे साजिशकर्त्यांचे काय झाले. जेव्हा आम्ही हाफिज सईद आणि जकी-उर-रहमान लखवी यांना अटक न करण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी पुरावे मागितले. आम्ही डेव्हिड हेडलीची जबानी नोंदवली असून त्याने स्पष्ट सांगितले की मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि लष्कर-ए-तैय्यबा यांचा थेट संबंध आहे. आम्ही सर्व डॉसियर पाकिस्तानला पाठवले, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पाकिस्तान आजही शांत आहे. जर पाकिस्तानची सरकार खरोखर लोकशाहीवर विश्वास ठेवत असेल, तर ते कोणाला घाबरत आहेत?” २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाच्या (LeT) दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि तब्बल ६० तासांच्या भीषण कारवाईत १८ सुरक्षा कर्मचार्यांसह एकूण १६६ जणांची हत्या केली होती.
