bank of maharashtra

राजस्थान : भारत–पाक सीमेवर नवा एअरबेस उभारण्यास हिरवा कंदील

0

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य

जोधपूर : राजस्थानला लागून असलेल्या भारत–पाकिस्तान सीमेवर भारतीय हवाई दलाचा नवीन हवाई तळ (एअरबेस) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. हा नवीन हवाई तळ श्रीगंगानगर जिल्ह्यातील सादुलशहर तहसील परिसरात उभारण्यात येणार असून तो पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असेल. या हवाई तळामुळे युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानमधील जकोबाबाद, भोलारी आणि रहीम यार खान येथील प्रमुख हवाई तळांपर्यंत भारतीय लढाऊ विमाने वेगाने पोहोचू शकतील.

या प्रकल्पासाठी लालगढ जाटान व आसपासच्या भागातील जमीन अधिग्रहित केली जात आहे. मात्र, ५८ शेतकरी आणि जमीनमालकांनी या भूसंपादनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. १८ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती डॉ. नूपुर भाटी यांनी सर्व याचिका फेटाळून लावत भूसंपादन प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा जनहित अधिक महत्त्वाचे असते आणि केवळ तांत्रिक कारणांवर अशा प्रकल्पांना अडथळा आणता येत नाही.

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, सामाजिक परिणाम मूल्यांकन (SIA), जनसुनावणी, वृत्तपत्रातील सूचना, संयुक्त सर्वेक्षण, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांचे अहवाल, तसेच पुनर्वसन (R&R) संदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रक्रिया पाळली गेली नाही, हा याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला.

हा हवाई तळ ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत उभारण्यात येत असून तो सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पासाठी चक २१ SDS येथे सुमारे १३०.३४९ हेक्टर खाजगी जमीन आणि २.४७६ हेक्टर सरकारी जमीन अधिग्रहित केली जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानकडून राजस्थान सीमेवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आला होता. राजस्थानमधील हवाई तळांनाही लक्ष्य करण्यात आले होते, मात्र भारतीय सुरक्षायंत्रणांनी हे प्रयत्न हाणून पाडले.

याच ऑपरेशनदरम्यान राजस्थानमधील हवाई तळांवरूनच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने राजस्थान सीमेवरील लष्करी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. नवीन सादुलशहर हवाई तळामुळे राजस्थानमधील हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून, हा श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगडनंतरचा दुसरा हवाई दल स्टेशन ठरणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech