नवी दिल्ली : ब्रॉडबँडच्या वाढीमुळे भारतातील इंटरनेट ग्राहकांची संख्या ३० जून २०२५ पर्यंत १००२.८५ दशलक्ष इतकी झाली आहे. ही संख्या मार्च २०२५ च्या तुलनेत ३.४८ टक्क्यांनी वाढल्याची माहिती सरकारने दिली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार, या १०० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांपैकी ४.४७ कोटी ग्राहकांकडे वायरड इंटरनेट कनेक्शन आहे, तर ९५.८१ कोटी ग्राहक वायरलेस इंटरनेटचा वापर करत आहेत. ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ३.७७ टक्क्यांनी वाढून ९७.९७ कोटी झाली आहे, तर नैरोबँड वापरकर्त्यांची संख्या कमी होऊन २.३१ कोटी राहिली आहे. जूनच्या तिमाहीत भारतातील एकूण टेलिफोन ग्राहकांची संख्या १२१.८३ कोटी झाली, जी मागील तिमाहीच्या तुलनेत १.४६ टक्क्यांनी जास्त आहे.
अधिकृत प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले की, यामुळे भारतातील एकूण दूरसंचार घनता वाढून ८६.०९ टक्के झाली असून, ती मागील तिमाहीत ८५.०४ टक्के होती. लोकसंख्येच्या संदर्भात, शहरी भागातील इंटरनेट ग्राहकांची संख्या सुमारे ५७.९४ कोटी, तर ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या ४२.३३ कोटी आहे.आकडेवारीनुसार, वायरलेस सेवांसाठी मासिक सरासरी प्रति ग्राहक महसूल (एआरपीयू) १८६.६२ इतका आहे. तर, प्रति वायरलेस ग्राहक मासिक सरासरी वापराचा कालावधी (एमओयू) दरमहा १६.७६ तास आहे. दूरसंचार क्षेत्रातील सकल महसूल ९६,६४६ कोटींवर पोहोचला, जो मागील तिमाहीच्या तुलनेत १.६३ टक्क्यांनी कमी आहे, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत १२.३४ टक्क्यांनी जास्त आहे.
समायोजित सकल महसूल ८१,३२५ कोटी रुपये असून, तो मागील तिमाहीच्या तुलनेत २.६५ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये प्रवेश सेवांचा वाटा ८३.६२ टक्के आहे. तसेच परवाना शुल्क २.६३ टक्क्यांनी वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला आहे, तर पास-थ्रू शुल्क १९.४५ टक्क्यांनी घटून १०,४५७ कोटी रुपये झाला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुमारे ९१२ खाजगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सना अपलिंकिंग किंवा डाउनलिंकिंग किंवा दोन्हीसाठी परवानगी दिली आहे. भारतामध्ये डाउनलिंकिंगसाठी उपलब्ध असलेल्या ९०२ सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सपैकी, ३० जून २०२५ पर्यंत ३३३ चॅनेल्स हे पे टीव्ही स्वरूपात आहेत.